सर विश्वेश्वरय्या यांचा जन्म दिनांक १५ सप्टेंबर १८६१ या दिवशी आजच्या कर्नाटकात आणि पूर्वीच्या म्हैसूर राज्यात असणारे मदनहळ्ळी नावाच्या खेडे गावात झाला. वडील पंडित श्रीनिवास शास्त्री हे एक विद्वान ब्राह्मण होते. आयुर्विद्या पारंगत असे ते वैद्य होते .त्यांच्या आई ह्या धर्मपरायण होत्या .आचारविचारांची शुचिता हे या कुटुंबाचे वेगळेपण होते. घरच्या गरिबीला मनाच्या श्रीमंतीची सोबत होती.
१८८० मध्ये विश्वेश्वरय्या पदवीधर झाले. त्याकाळी शिकणारे थोडे होते. अभ्यासक्रमही भिन्न आणि संमिश्र होते .पदवीपरीक्षेत विशेष श्रेणीत उत्तीर्ण होणाऱा विद्यार्थी एखाद्या तांत्रिक विषयाची पदवी संपादन करू शकत असे. विश्वेश्वरय्यांना असाच एक अभ्यासक्रम अभिप्रेत होता. त्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. त्यांना म्हैसूर सरकारने एक शिष्यवृत्ती मंजूर केली. पुणे शहरात तेव्हा सायन्स कॉलेज नावाचे एक महाविद्यालय होते. त्यात सिव्हिल इंजीनियरिंगसारखे विषयसुद्धा शिकवले जात .विश्वेश्वरय्यांनी स्थापत्यशास्त्राचे विषय निवडले. परीक्षेचा निकाल जाहीर होताच सरकारने त्यांची नियुक्ती सहाय्यक अभियंता म्हणून केली.

विश्वेश्वरय्या यांनी स्थापत्यशास्त्राचे विषय निवडले. परीक्षांचा निकाल जाहीर होताच नाशिक विभागात ते प्रथम रुजू झाले. त्यांचा कारभार चांगला असल्यामुळे, त्यांच्यावर खानदेशातील एका नाल्यावर ‘पाइप व सायफन’ बसवण्याची कामगिरी सोपविण्यात आली. काम तसे सोपे पण अचूकतेने त्वरेने करण्याची निकड होती. त्याला तसे व्यावसायिक नैपुण्य पण हवे होते. विश्वेश्वरय्यांनी आपले समायोजन सामर्थ्य पणाला लावून ते काम पार पाडले.
धरणाची उंची न वाढविता त्याची साठवण क्षमता कशी वाढवायची याची आपण कल्पना करू शकता! पूणेजवळील खडकवासला धरणाची जलाशय क्षमता वाढविण्यापूर्वी विश्वेश्वर यांची नोंद प्रथम घेण्यात आली. धरणांची जलसाठा वाढवण्यासाठी विश्वेश्वरयांनी खडकवासला धरणात पुण्यामधून वाहणाऱ्या मुठा कालव्याच्या पूर नियंत्रणासाठी प्रथम स्वयंचलित स्लॉईसेसचा वापर केला. त्यांनी या स्ल्युइस स्वत: च्या नावाने पेटंट केल्या.
कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळात मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी कोल्हापूर, बेळगाव, धारवाड, विजापूर, अहमदाबाद आणि पूणे यासह अनेक शहरांमध्ये पाणीपुरवठा प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात काम केले. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे कुशल प्रशासक देखील होते. त्यांची म्हैसूर राज्याचे मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती झाली. यासह ते रेल्वे सचिवही होते. कृष्णराज सागर धरणाच्या बांधकामामुळे मोक्षगुंडम विश्वेश्वरयांच्या नावाची चर्चा संपूर्ण जगात सर्वाधिक झाली. हे म्हैसूर येथील धरण स्वातंत्र्याच्या सुमारे चाळीस वर्षांपूर्वी बांधले गेले होते. या धरणातून ४५ कि.मी. लांबीचा विश्वेश्वरय्या कालवा आज कर्नाटकातील रामनगरम व कनकपुरा याशिवाय मंड्या, मालवली, नागमंडला, कुनिगल आणि चन्नपटना तहसीलमधील सुमारे १.२५ लाख एकर जामिनीचे सिंचन करतो.
म्हैसूर आणि बेंगळुरू सारख्या शहरांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करणारे कृष्णराज सागर धरण, वीज निर्मितीसह सर मोक्षगुंडम विश्वेश्वरयांच्या तांत्रिक कौशल्याची आणि प्रशासकीय नियोजनाची यशोगाथा सांगते. तोपर्यंत विशाल धरणांसारख्या रचनांची तत्त्वे मोठ्या प्रमाणात समजली गेली नव्हती. म्हणूनच, कृष्णराज सागर धरणाचे बांधकाम त्यांना सर्वात मोठे आव्हान होते. हायड्रॉलिक अभियांत्रिकीचे तत्कालीन पैलू लक्षात घेऊन, कावेरी नदीचे पाणी थांबविणे आवश्यक होते. सिमेंटशिवाय धरण बांधण्याचे मोठे आव्हान होते. कारण त्यावेळी देशात सिमेंट उत्पादन नुकतेच सुरु झाले होते आणि त्यास अत्यंत महागड्या किंमतीत आयात करावे लागे. परंतु या समस्येवर विश्वेश्वर्यांनी तोडगा देखील काढला. जलाशयातील पाणी सोडण्यासाठीचे स्वयंचलित दरवाज्यांचे तंत्र त्यांनी विकसीत केले.अशा तंत्रज्ञानाचा वापर जगभरात प्रथमच झाला. नंतर हे तंत्र युरोपसह जगातील इतर देशांनी अवलंबले.
धरण बांधणी तसेच औद्योगिक विकासात विश्वेश्वरयांचे योगदान कामी आले. कावेरीवर धरणाच्या बांधकामाबरोबरच त्या भागात गिरण्या आणि कारखानेही उभारले जात होते.वीज आल्यामुळे नवीन मशीन्स वेगाने काम करत होती. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या औद्योगिक विकासाचे वकील होते.बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे मेटलर्जी, एरोनॉटिक्स, इंडस्ट्रियल आणि अभियांत्रिकी विभाग यासारखे अनेक नवीन विभाग सुरू करण्याचे स्वप्न पाहणार्या पहिल्या लोकांपैकी विश्वेश्वरय्या हे एक होते.
विश्वेश्वरयांना म्हैसूर राज्यातील निरक्षरता, दारिद्र्य, बेरोजगारी, रोग इत्यादी मूलभूत समस्यांविषयी काळजी होती. कारखान्यांचा अभाव, सिंचनासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पारंपारिक शेतीच्या वापराचा विकास होत नव्हता. या समस्या सोडविण्यासाठी विश्वेश्वरयांनी बरेच प्रयत्न केले. सर विश्वेश्वरयांच्या दूरदृष्टीमुळे म्हैसूरमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले गेले. आणि मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेण्यात आला. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कामांमुळे विश्वेश्वरय्या यांना “कर्नाटकचा भगीरथ” असेही म्हणतात.सरकारी नोकरीत त्यांनी एक कागदही स्वतःसाठी वापरला नाही व सरकारी वाहनही त्यांनी खाजगी कामासाठी वापरले नाही.
इसवी सन १९५५ मध्ये भारतरत्न या विशेष पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. विश्वेश्वरय्या तेव्हा ९४वर्षांचे होते. त्यांच्या कर्तुत्वाचा कळस केव्हाच झाला होता. सेवानिवृत्तीनंतर ४४ वर्षे अविरत कार्यरत राहिलेले एक दीर्घायुषी स्थापत्यविशारद म्हणून जग विश्वेश्वरय्या यांना ओळखते. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या शंभर वर्षांचे झाले .जीवनाचे अशी सुदीर्घ आणि सोनेरी सायंकाळ अनुभवणाऱ्या या भीष्माचार्यांना कोणीतरी संदेश मागितला .तेव्हा एका ओळीत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .”झिजलात तरी चालेल ; पण गंजू नका” हा त्यांनी युवा पिढीला दिलेला संदेश होता.

शंभर वर्षांचे कृतार्थ आणि संपन्न जीवन जगनाऱ्या या ज्ञानमहर्षीला कौटुंबिक सुखाचे क्षण मिळाले नाहीत. त्यांना पत्नीसुख लाभले नाही. पुत्रमुख दिसले नाही .कन्यादान करता आले नाही ! सदैव कार्यरत असणाऱ्या या आत्मपर्याप्त पुरुषाला, आत्मतृप्त महात्म्याला जीवनातील दुःख जोखण्याएवढी उसंत मिळाली नाही. दिनांक १४ एप्रिल १९६२ या दिवशी या थोर पुरुषाने गेल्या शतकाकडे वळून पाहिले आणि मृत्यूची काठी टेकीत अमरत्वाकडे प्रयाण केले. अशा या विज्ञानयुगातील विश्वकर्मा विश्वेश्वरय्या यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
सौजन्य : इंजि, कुबेर जाधव , देवळा (नाशिक)






