नंदुरबार (विशेष प्रतिनिधी) : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे काल भावी सहकारी या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चा रंगत असतांनाच आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एकाच गाडीतून प्रवास करताना दिसून आल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, आता एका नवीनच चर्चेला तोंड फुटले आहे.
नंदुरबार येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी के अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकर्पणाचा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत. याच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील हे एकाच कारमधून आले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा एकत्र कार प्रवास पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या.
काल औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत व्यासपिठावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे होते. आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील नंदुरबार जिल्ह्यात एकाच व्यासपिठावर आहेत. त्या पाठोपाठ आता उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात एकाच व्यासपिठावर दिसल्याने, राज्यातील राजकारणात लवकरच राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.






