देवनिधीची लूट, मंदिरांत चोरी हे तर मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणामच

श्री तुळजाभवानी मंदिरातील देवनिधीची लूट करणार्‍या अन्य भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई कधी होणार ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्‍न

जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे प्राचीन दागदागिने, वस्तू आणि प्राचीन नाणी यांच्या चोरीप्रकरणी फरार असलेल्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना वर्षभरानंतर तुळजापूर पोलिसांनी अटक केली; एवढेच पुरेसे नाही. श्री तुळजाभवानी देवीचा खजिना लूट प्रकरणाची व्याप्ती आणि कालखंड मोठा आहे. केवळ दिलीप नाईकवाडी हे एकटेच दोषी असण्याची शक्यता कमी आहे. या प्रकरणाचा सूत्रधार, त्या काळात कार्यरत कनिष्ठ तथा वरिष्ठ शासकीय अधिकारी, तसेच या लुटीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणार्‍यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन हे या सर्व भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई कधी करणार, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीने केला आहे.

29 नोव्हेंबर 2001 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत दिलीप नाईकवाडी यांनी श्री भवानीदेवीचे अतिप्राचीन अलंकार, वस्तू, तसेच भाविकांनी अर्पण केलेले सुमारे 348.661 ग्रॅम सोने आणि 71698.274 ग्रॅम चांदीच्या वस्तू अन् 71 प्राचीन नाणी यांची चोरी केली. या प्रकरणी तक्रार करून त्याचा सातत्याने पाठपुरावा करणारे तुळजापूर येथील पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांचे समिती मनापासून अभिनंदन करते. अशी जागरूकता सर्वच भक्तांमध्ये असायला हवी. नाईकवाडी यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई व्हायला हवी, जेणेकरून कोणाचीही देवीची संपत्ती लुटण्याची हिंमत होणार नाही. पोलीस-प्रशासनानेही देवीच्या खजिन्यातील लुटलेल्या सर्व वस्तू, नाणी, दागदागिने पुन्हा प्राप्त होईपर्यंत कोणाच्याही दबावाला बळी न पडता कठोर कारवाई चालूच ठेवावी.

या प्रकरणाप्रमाणेच हिंदु जनजागृती समितीने श्री तुजळाभवानी मंदिराच्या वर्ष 1991 ते 2009 या काळातील शेकडो कोटी रुपयांचा दानपेटी आणि 265 एकर भूमी घोटाळ्याचा विषय सातत्याने लावून धरला होता. यासाठी समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने वर्ष 2017 ला घोटाळ्याचा चौकशी अहवाल गृह विभागाला सादर केला आहे; मात्र त्यात कोण दोषी आहे आणि कोणावर कारवाई केली, ते अद्यापही उघड झालेले नाही. यातील दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी विधानसभेत तारांकित प्रश्‍न, विधान भवनात आमदारांची आंदोलने, राज्यभर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही अनेक आंदोलन केली; मात्र शासनाने या प्रकरणी संवेदनशील का नाही ? अशा प्रकरणांतून मंदिर सरकारीकरणामुळे मंदिराची कशाप्रकारे लूट होते, हेच सिद्ध होते. यातील दोषींना वाचवण्याचा कितीही प्रयत्न झाला, तरी घोटाळेबाजांनी लक्षात घ्यावे की ‘भगवान के घर देर है; अंधेर नही !’ आदिशक्ती श्री तुळजाभवानी ही असुरी प्रवृत्तींना कठोर शिक्षा केल्याशिवाय रहाणार नाही, अशी आमची श्रद्धा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here