जळगाव (संपादक सुनिल पाटील) | आपले शौर्य, निस्वार्थ वृत्ती आणि मानवतावादी कार्याने समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या खऱ्याखुऱ्या नायकांचा (Real-life Heroes) ‘सोशल हार्मनी’ संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. ‘हार्मोनी हिरोज २०२६’ या विशेष सोहळ्यात विविध क्षेत्रांतील धाडसी आणि मानवतावादी व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. हा सोहळा उपस्थितांसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि भावुक करणारा ठरला.
विविध आपत्तींमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचवणाऱ्या व्यक्तींची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने खालील क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. रस्ते अपघात, भीषण आगीच्या दुर्घटना, आणि पुराच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणारे धाडसी नागरिक, कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात जीवाची बाजी लावून वैद्यकीय आणि सामाजिक मदत पोहोचवणारे कार्यकर्ते. कुटुंबाने नाकारलेल्या किंवा बेवारस मृतदेहांवर अत्यंत सन्मानपूर्वक अंतिम संस्कार करून मानवतेची जपणूक करणारे देवदूत.
या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कारार्थींच्या संघर्षाची आणि शौर्याची कथा ऐकून उपस्थित अनेक नागरिकांचे डोळे पाणावले. कार्यक्रमाच्या शेवटी, ‘सोशल हार्मनी’ परिवाराच्या वतीने सर्व सन्माननीय अतिथी, स्वयंसेवक आणि पाठीराख्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. या भव्य यशानंतर, समाजात अशीच दयाळूपणा, शौर्य आणि करुणेची भावना निरंतर तेवत ठेवण्याचा आणि अशा खऱ्या हिरोंना प्रोत्साहन देण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे.







