पुणे (विशेष प्रतिनिधी) – कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले, या संकटात अनेकांना आपली नोकरीही गमवावी लागली. तर, उद्योगपतींचे मोठे नुकसान झाले. कोरोनामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी आता लोकं कोणत्याही मार्गाचा अवलंब करत आहेत. असाच प्रकार पुण्यात घडला. पुण्यातील एका विमा कंपनीतील मॅनेजत अर्पित गुप्तानं आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी धक्कादायक पाऊल उचललं.
पुण्यातील एका विमा कंपनीत काम करत असलेल्या अर्पितने काही महिन्यांपूर्वी कर्ज घेऊन रेस्टॉरंट सुरू केले होते. मात्र कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे रेस्टॉरंट बंद झाले, परिणामी कर्जाचे हफ्ते चुकवण्यासाठी अर्पितकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यानं चक्क चरसची तस्करी करण्यात सुरुवात केली. राजेंद्र नगर पोलिसांनी अर्पितला 2 लाख रुपये आणि 860 ग्रॅम चरससह रंगेहात पकडलं. अर्पित मुळचा कानपूरचा असून पुण्यात गेली काही वर्ष तो काम करत होता.
अर्पितनं कानपूरमध्ये राहणाऱ्या आपल्या मित्राकडून चरस मागवलं. अर्पितचा हा मित्र नेपाळमधून चरस मागवत होता. चरसची तस्करी करून जास्त पैसे मिळत असल्यामुळे अर्पितने हे काम सुरू केले. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अर्पितला अटक केली.







