कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील बोरपाडळे घाटात चालत्या कारने अचानक पेट घेतल्याने एका हॉटेल व्यावसायिकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
गुरुवारी दुपारी बोरपाडळे घाटातून हॉटेलच्या दिशेनं जाताना ही दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत हॉटेल व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. भररस्त्यात ही दुर्घटना घडल्याने एक तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली आहे.
संबंधित दुर्घटनेत मृत पावलेल्या हॉटेल व्यावसायिकाचं नाव अभिजित पांडुरंग ठाणेकर (वय-३२) असून ते आजरा तालुक्यातीलल पिंपळगाव झुलपेवाडी येथील रहिवासी आहेत. मृत अभिजित हे गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास आपल्या कारने पन्हाळा तालुक्यातील नावली येथील आपल्या धाब्याच्या दिशेने जात होते. दरम्यान कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील बोरपाडळे घाटात त्यांच्या कारने अचानक पेट घेतला.
या आगीचं रुप इतकं भयंकर होतं की कारने एका क्षणातच रौद्ररूप धारण केलं.आगीचा भडका इतका भयंकर होता की, त्यांना कारमधून बाहेरही येता आलं नाही. या दुर्दैवी घटनेत अभिजित यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यामुळे महामार्गावर बराच काळ वाहतूकीचा खोळंबा झाला होता.






