मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : गुलाबनंतर आता महाराष्ट्राला शाहीन चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मराठवाड्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांतून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ निवळले असले तरी त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यात कालपासून तुफान पाऊस बरसत आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुलाब चक्रीवादळामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा प्रभाव पुढील २४ तास राज्यावर पाहायला मिळणार आहे. मुंबईसह ठाणे आणि उपनगरात जोरदार पाऊस बरसत असून येत्या २४ तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
‘गुलाब’ चक्रीवादळ रविवारी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले होते. त्यानंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली. मात्र, या काळात किनारपट्टीच्या भागाला त्याने तडाखा दिला. तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सध्या छत्तीसगड आणि ओडिसाच्या दक्षिणेला आहे. त्यानंतर ३० सप्टेंबरला हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करणार असून, अरबी समुद्रात त्याची तीव्रता पुन्हा वाढून नवे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याचे नाव ‘शाहीन’ असणार आहे.
उद्या उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात प्रभाव राहील, असा अंदाज आहे. पुढील ३ ते ४ तासात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा आहे. धुळे , पालघर , ठाणे , मुंबई , रायगड , नाशिक , अहमदनगर , पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे. पालघर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि जालना या ५ जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. तर मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.






