पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : शहरात मागील काही दिवसांपासून रिक्षा चालकांवर सातत्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत आहेत. या घटनेमुळे प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन बदलत आहे. लष्कर पोलीस स्टेशनने उपक्रम राबवत शहरातील रिक्षा चालकांसाठी ‘सुरक्षित रिक्षा २०२१ ‘ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र पोलिसांच्या उपक्रमाला प्रत्युत्तर म्हणून रिक्षावाला संघटनेकडून पोलिसांसाठीच भरघोस बक्षीस असणारी अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
लष्कर पोलीस स्टेशनने आयोजित केलेल्या स्पर्धेचा निषेध म्हणून “पोलीस ठाणे, प्रामाणिक पोलीस ठाणे” अशी विडंबनात्मक स्पर्धा “बघतोय रिक्षावाला फोरम” या रिक्षावाला संघटनेने आयोजित केली आहे.राबवत आहे. ज्या पोलिस ठाण्यांमध्ये फायनान्स कंपन्यांच्या गुंडागर्दी विरोधात तक्रारी दाखल झाल्या असतील, त्या पोलिस ठाण्यांचा गौरव आम्ही करणार आहोत, असे संघटनेचे अध्यक्ष डॉ केशव क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ केशव क्षीरसागर पुढे बोलतांना म्हणाले की, कायदे मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, त्याबद्दल आमचे काही म्हणणं नाही. मात्र पुणे पोलीस रिक्षावाल्यांची स्पर्धा घेऊन रिक्षावाल्यांची प्रतिमा मलीन करत असल्याचा आरोप रिक्षा संघटनेने केला आहे. पुणे पोलिसांनी फायनान्स कंपनी विरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आम्ही वेळोवेळी केलेली आहे. माहितीच्या अधिकारात पुणे पोलीस आयुक्त आणि पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यालयाने माहिती दिली आहे. फायनान्स कंपनीविरुद्ध गुन्हा का दाखल करत नाही, म्हणून ही स्पर्धा आम्हाला घ्यावी लागली आहे.
‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचं स्पर्धेचे स्वरूप आणि बक्षीसांमध्ये उपमुख्यमंत्री प्रामाणिक पोलिस ठाणे चषक – बक्षीस स्वरूप एक कोटी रुपये असून, पोलीस चौकींनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आव्हान दिले आहे. ज्या पोलिस चौकी यांना भाग घ्यायचा आहे त्या ठाण्यामध्ये कमीत कमी एक केस २१ऑगस्ट २०२० ते २१ ऑगस्ट २०२१ पर्यंत फायनान्स कंपन्यांच्या गुंडा विरोधात नोंदली गेलेली असावी.






