शेतकऱ्यांनी केली गांज्याची शेती. पोलिसांनी केली अटक

राजूर (प्रतिनिधी) :  राजूर पोलिस स्टेशन हद्दीतील वारंघुशी गावातील कळम देवीवाडी येथील डोंगर दरीत काही शेतकर्‍यांनी गांज्याची शेती केल्याची माहिती राजूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने व राजूर पोलीस स्टेशन चे सा. पो. नि नरेंद्र साबळे व त्यांच्या पथकाने रस्ता नसल्याने पायी जाऊन या गांज्याच्या शेतीचा छडा लावला. सलग दोन दिवस कारवाई करून पोलिसांनी तब्बल 2 लाख 70 हजार रूपये किंमतीचे 270 किलो गांज्याची ओली झाडे उपटून ताब्यात घेतली. याप्रकरणी चार जणांवर एनडीपीसीएस अ‍ॅक्ट 1985 चे कायदा कलम 20/22 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, वारंघुशी येथील कळम देवीच्या डोंगर दरीत मनोहर माधव घाणे, गोपाळा नामदेव लोटे, धोंडीराम चिंधू घाणे, चंदर देवराम लोटे या शेतकर्‍यांनी आपल्या शेतीत गांज्याच्या झाडाची लागवड केली होती. याबाबतची माहिती राजूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना खबर्‍या मार्फत मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविली.

जिल्हा अधिक्षक मनोज पाटिल, श्रीरामपूर अपर पोलिस अधिक्षक दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, सहाय्यक पो. नि. नरेंद्र साबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खैरनार, पो. ना. दिलीप डगळे, अशोक काळे, अशोक गाडे, विजय फटांगरे, साईनाथ वर्पे, ढाकणे यांच्या पथकाने काल गुरूवारी सायंकाळी 4 च्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली.

सदर घटनास्थळी वाहनाने जाणे शक्य नसल्याने या पथकाने सुमारे 3 किलोमिटर डोंगर दरीत पायी जात कारवाई सुरू केली. यावेळी या शेतात इतर पिका बरोबर गांज्याची झाडे बहरलेली आढळून आली. गुरूवारी उशिर झाल्याने व अंधार पडल्याने या पथकाने 4 किलो 600 ग्रॅम झाडे तोडून ताब्यात घेतली. आज शुक्रवारी पुन्हा सकाळी या पथकाने घटनास्थळी जाऊन उर्वरीत कारवाई केली. या कारवाईत एकूण तब्बल 270 किलो हिरवीगार गांज्याची झाडे (2 लाख 70 हजार रूपये किंमत) ताब्यात घेतली तसेच वरील चार जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. राजूर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतूक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here