बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) : खुलताबाद तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांना मदत म्हणून सायकल, शिलाई मशीन, पिठाची गिरणी, गॅस सिलेंडर इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले असून कार्यक्रम संपताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपविभागीय अधिकारी महसूल जनार्धन विधाते, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी सुरडकर, तसेच पोलीस अधीक्षक ग्रामीण निमित गोयल, पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या उपस्थितीत चर्चा करून वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ व तालुका अध्यक्ष मुक्तार भाई सय्यद यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, शासकीय व प्रशासकीय जनसुविधा काम सुरू करण्याअगोदर कामाच्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात यावे जसे जलसंधारण विभागाचे कोल्हापुरी बंधारे, पाणी फाउंडेशन, सर्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, कृषी विभाग, आदिवासी विभाग, आमदार निधी, खासदार निधी, तसेच जिल्हा परिषद निधी, ग्रामपंचायत स्तरावर कामे या सर्व ठिकाणी कामाचा एकूण रकमेचा निधीचा सूचना फलक चालू कामाच्या ठिकाणी लावणे आवश्यक आहे. परंतु आजपर्यंत खुलताबाद तालुक्यात कोणत्याही कामावर सूचना फलक लावण्यात आले नाही.
त्यामुळे नागरिकांना कामाच्या बाबतीत खरी माहिती होत नाही त्यामुळे काम करणारे ठेकेदार यांचा फायदा होऊन निकृष्ट दर्जाचे काम थातूरमातूर करून मोकळे होतात. करिता कामाच्या ठिकाणी सूचना फलक लावणे गरजेचे आहे. जर चालू कामाच्या ठिकाणी सूचना फलक न लावल्यास वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी जाऊन काम होऊ देणार नाही जोपर्यंत सूचना फलक लावत नाही. याची प्रशासनाने दखल घ्यावी असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी तालुका अध्यक्ष मुक्तार भाई सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष वसंत शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष अशोक शेजवळ, जिल्हा संघटक बाबा पटेल, तालुका महासचिव राजाराम घुसाळे, नितीन जाधव, सर्कल प्रमुख अरुण गायकवाड, कलीम पठाण, राहुल साठे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.






