नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : देशात परतीच्या पावसाने अनेक राज्यांना तडाखा दिला आहे. केरळ, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक राज्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जीवित आणि वित्तहानी झाल्याचं वृत्त आहे.
केरळमध्ये सध्या पावसाचा कहर सुरू असून, आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या केरळवर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, अनेक जणांचा बळी गेला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून कोट्टायममधील मुंडकायममध्ये रविवारी मुसळधार पावसामुळे अवघ्या एक सेकंदात एक घर पूर्ण वाहून गेलं.त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#WATCH | Kerala: A house got washed away by strong water currents of a river in Kottayam's Mundakayam yesterday following heavy rainfall. pic.twitter.com/YYBFd9HQSp
— ANI (@ANI) October 18, 2021
या व्हिडीओवरून तिथली गंभीर परिस्थिती लक्षात येत आहे. या घरातील सहा जणांचा मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी काल तिघांचे मृतदेह बाहेर काढले, तर उर्वरित मृतदेह आज बचाव पथकाने काढले. मृतांमध्ये या कुटुंबातील ४० वर्षीय प्रमुख, त्याची ७५ वर्षीय आई, ३५ वर्षीय पत्नी आणि १४, १२ आणि १० वर्षे वयाच्या तीन मुलींचा समावेश आहे.
केरळमध्ये शनिवारपासून सुरू असललेल्या मुसळधार पावसाने पूर आणि भूस्खलनामुळे किमान २४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यातील डोंगराळ भागात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही लोकांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत नऊ मृतदेह सापडले आहेत. दोन लोक बेपत्ता आहेत, अशी माहिती इडुक्कीच्या जिल्हा दंडाधिकारी शीबा जॉर्ज यांनी दिली.






