अक्कडसे हाणामारीतील भादंवि कलम ३०७ रद्द करा : शिवसेनेची मागणी

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधिक्षक यांची भेट

शिंदखेडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे अक्कडसे गावातील ग्रामपंचायत गटनेते श्री.रावसाहेब सैंदाणे व इतरांवर भा.दं.वि. कलम ३०७ चा गुन्हा दाखल झाला असुन तो रद्द करावा, अशी मागणी शिवसेना शिंदखेडा तालुक्याच्या शिष्टमंडळाने आज पोलीस अधिक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

याप्रसंगी शिवसेनेचे शिंदखेडा व शिरपूरचे सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, माजी सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हासंघटक भाईदास पाटील, तालुकाप्रमुख गिरीश देसले, दोंडाईचा तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी, स्थानीय लोकाधिकारी समितीचे जिल्हाध्यक्ष हिरालाल बोरसे उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, शिंदखेडा तालुक्यातील मौजे अक्कडसे ता.शिंदखेडा जि.धुळे येथील गटनेते श्री.रावसाहेब सैंदाणे व इतरांवर राजकीय वैमनस्यातून झालेल्या हाणामारीत विरोधकांकडून भारतीय दंड विधान कलम 307 अन्वये गुन्हा दाखल झाला असुन सदर गुन्ह्यातील हाणामारीत कुठल्याही धारदार शस्त्राचा वापर झालेला नसुन फिर्याद दाखल करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर जखम किंवा इजा झालेली नाही. अक्कडसे ग्रामपंचायतीचे गटनेते श्री.रावसाहेब सैंदाणे यांचे भाऊ श्री.भाऊसाहेब सैंदाणे हे वाद मिटविण्याच्या हेतुने समजोता करण्यासाठी गेले असता उलटपक्षी त्यांचेवर हल्ला करण्यात आला. खर म्हणजे झालेल्या हाणामारीचे शिवसेना समर्थन करत नाही. दोषींना योग्य ते शासन झाले पाहिजे. परंतु गुन्हा दाखल करतांना पक्षपातीपणा व एकतर्फी निर्णय दिसुन येत आहे.

कुठल्याही प्रकारची गंभीर दुखापत नसतांना भा.दं.वि. कलम 307 लावणे हे कुठल्याही कायद्याच्या चौकटीत बसत नाही. शिवाय हाणामारी एकतर्फी होत नसते. त्यात दोन्ही गटाचा सहभाग असतो. असे असतांना गुन्हा मात्र एक पक्षाचा दाखल करुन घेतला आहे. त्यामुळे श्री.रावसाहेब सैंदाणे व इतरांवर दाखल झालेले भा.दं.वि. कलम 307 रद्द करण्यात यावे व संबंधितांची फिर्याद नोंदवण्यात यावी, याबाबतीत शिवसेना संबंधितांना योग्य न्याय मिळाला नाही तर शिंदखेडा तालुक्यातील असे अनेक प्रकारचे कुठलीही शहानिशा न करता पोलीस प्रशासनाने राजकीय दबावापोटी दाखल केलेले भा.दं.वि. कलम 307, 395, खंडणी सारखे खोटे गुन्हे चौकशीसाठी मा.मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची भेट घेऊ, असेही निवेदनात शेवटी नमुद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here