अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर-पुणे महामार्गावर गव्हाणवाडी (श्रीगोंदे) शिवारात भरधाव कंटनेर दुचाकीवर उलटल्याने झालेल्या अपघातात कंटेनरखाली दबून राळेगण सिद्धी येथील आई व मुलाचा मृत्यू झाला.
रविवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत स्वप्नील ऊर्फ बंडू बाळू मापारी (२७) व लक्ष्मीबाई बाळू मापारी (६२) यांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर नगर -पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव पोलिस ठाण्याचे हवालदार संतोष औटी, शिरूर पोलिस ठाण्याचे त्यांचे सहकारी, राळेगणसिद्धीचे माजी सरपंच लाभेश औटी, सुनिल हजारे, सुरेश पठारे, गणेश पोटे, विठू गाजरे, बाळासाहेब फटांगरे व राळेगण सिद्धी येथील तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.






