मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर त्यांच्या वक्तव्यांमुळे आरएसएस समर्थक ॲड. संतोष दुबे यांनी मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयात अख्तर यांच्याविरोधात कलम ४९९ (मानहानी), ५०० (बदनामी अंतर्गत शिक्षा) फौजदारी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे जावेद अख्तरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
आरएसएसची प्रतिष्ठा खराब करणे, नुकसान हेतूने, हेतुपुरस्सर बदनामीकारक काल्पनिक विधाने केल्या प्रकरणी जावेद अख्तरांवर फौजदारी तक्रार दाखल केली आहे. जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली असून, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले होते. अख्तर यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले होते.
माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अख्तर यांनी अफगाणिस्तान येथे जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे म्हणजे त्यांना या अतिरेकी संघटनेबद्दल बस्तुस्थिती लक्षात येईल, उसं प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिलं होतं.
जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. तसेच, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले होते. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संभाषण करताना अख्तर म्हणाले की, आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही तालिबान सारखेच उद्दिष्ट आहे. ते म्हणाले की, भारतीय संविधान त्याच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, परंतु जर संधी मिळाली तर ते या सीमादेखील ओलांडतील.






