तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणारी टोळी जेरबंद

अहमदनगर (प्रतिनिधी) : नेवासा पोलिसांनी लग्न करून आर्थिक लूट करून नवर्‍या मुलीसह पोबारा करणारी 7 जणांची टोळी पोलिसांनी पकडली असून या 7 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नेवासा तालुक्यातील नागापूर येथील चंद्रकांत रायभान शेजुळ (वय ५५ वर्षे) धंदा-शेती रा. नागापूर ता. नेवासा यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये लक्ष्मण मंजाबापू नवले (रा. वडाळा बहिरोबा ता. नेवासा), राजुूदेवराव साळवे (रा. रामेश्वरनगर जि. परभणी), मुनीरखान अमीरखान (रा. संजय गांधीनगर परभणी), अश्वीनी सचिन केदारे (रा. मगरमळा नाशिक), मुमताज सलीम पटेल (रा. औरंगाबाद), शहनाज नाशीर शेख (रा. औरंगाबाद ) व स्नेहा गौतम मोरे (रा. औरंगाबाद) या ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

या सर्वांना अटक करून नेवासा न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी यांच्या मुलासोबत अश्वीनी सचिन केदारे हिचे लग्न ठरले होते. लग्न ठरवताना तिच्या आई-वडील व इतर नातेवाईकांच्या समक्ष लग्न लावून देतो असे लग्न जमवणार्‍या वरील आरोपींनी सांगितले होते. प्रत्यक्षात मुलीचे आई वडील व इतर नातेवाईक लग्नासाठी आले नाहीत.

तेव्हा फिर्यादीसह फिर्यादीचा मुलगा व मुलाच्या अन्य नातेवाईकांना या सर्व लोकांचा संशय आला. मुलगा लग्नास तयार झाला नाही. तेव्हा आरोपी मुलास म्हणाले की आम्ही चार मुली आणलेल्या आहेत. तुम्ही त्यांचेवर अतिप्रसंग करीत आहेत असा आरडाओरडा करू.त्यामुळे गुपचूप लग्न लावून द्या व आमची ठरलेली दोन लाख रुपये रक्कम द्या. अशी धमकी देऊन पैशाची मागणी करून फसवणूक केली.या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी वरील सातही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here