मुंबई (संपादक सुनिल पाटील) : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना पाठिंबा व्यक्त करतानाच कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मोठा आरोप केला आहे. समीर वानखेडे हे अतिशय कार्यशील अधिकारी असून त्यांनी २५ कोटींची लाच मागितील असे सांगण्यासाठी एनसीबीचे पंच प्रभाकर साईलला पैसे देण्यात आले, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. यावेळी वानखेडे कुटुंबीयांनी आठवले यांनी उपलब्ध सर्व कागदपत्रे दाखवली. त्यानंतर रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी वानखेडेंवर आरोप करणारे राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे.
समीर वानखेडे हे अत्यंत सक्रिय आहे. कोणतीही पर्वा न करता हा अधिकारी कारवाई करतो. म्हणूनच त्यांना एनसीबीमध्ये आणण्यात आले. वानखेडे हे दलित समाजातील असून आंबेडकरवादी आहेत, असे आठवले म्हणाले. यावेळी त्यांनी आर्यन खान अटक प्रकरणावरही भाष्य केले. आर्यनच्या प्रकरणात आमचे म्हणणे असे आहे की, आर्यनजवळ जर काही ड्रग्ज सापडले नाही, किंवा त्याने ड्रग्जचे सेवन केले नव्हते, किंवा कुणाकडे काहीच सापडले नाही, असे कोणाचे म्हणणे असेल तर मग त्याला कोर्टाने २२ दिवस जामीन देण्याचे का नाकारले?, असा सवाल आठवले यांनी उपस्थित केला आहे.
कार्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीकडे सर्व पुरावे होते, असे सांगतानाच एनसीबीचा पंच प्रभाकर साईलला पैसे देऊन समीर वानखेडेने २५ कोटीची लाच मागितली असे खोटे सांगायला लावले आहे, असा आमचा आरोप आहे, असे आठवले म्हणाले. गोसावी याने देखील प्रभाकर साईच्या विरोधात भूमिका मांडलेली आहे. हे सगळे षडयंत्र असल्याचा आरोपही आठवले यांनी केला आहे. समीर वानखेडे हे आंबेडकरवादी असून त्यांच्यासारख्या अत्यंत अॅक्टिव्ह अशा अधिकाऱ्याला त्रास होता कामा नये. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वानखेडे कुटुंबीयांच्या पाठीशी असेल असेही आठवले म्हणाले.






