पोलिसांनी १०० किलोमीटर पाठलाग करून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पाच आरोपींना ठोकल्या बेड्या

दौसा (राजस्थान) : गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये ड्रग्ज तस्करीच्या घटना उघडकीस येत आहेत. येथील दौसा पोलिसांनी मोठी कारवाई करून ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे , पोलिसांनी या आरोपींना पकडण्यासाठी तब्बल १०० किलोमीटरपर्यंत पाठलाग केला.

ड्रग्ज प्रकरणातील हे पाचही आरोपी चित्तौरगढ येथून कारमधून गांजा घेऊन दौसाकडे येत होते. त्याचवेळी दौसा पोलिसांच्या विशेष पथकाला या तस्करीची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी एका संशयित कारचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी तब्बल १०० किलोमीटरपर्यंत कारचा पाठलाग केला. दौसा शहरात कारने प्रवेश करताच, पोलिसांनी कार अडवली. त्यानंतर झडती घेतली असता, त्यात ४६ किलो गांजा सापडला. त्यानंतर पोलिसांनी कार आणि गांजा जप्त केला. तसेच कारमधील पाचही आरोपींना अटक केली.

आरोपी सचिन गुर्जर, राजेश सैनी, भूपेंद्र गुर्जर, चंद्रशेखर, दिनेश सैनी अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे पाचही जण गेल्या अनेक वर्षांपासून अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी चौकशी केली असता, गांजा मध्य प्रदेश येथून चित्तौरगढ आणि तेथून मग दौसा येथील सिकंदरा परिसरात आणला जात होता, अशी माहिती मिळाली. मात्र, या तस्करीची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचला. या सापळ्यात पाच ड्रग्ज तस्कर अलगद अडकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here