जोधपूर (राजस्थान) (वृत्तसंस्था) । प्रसिद्ध कथावाचक साध्वी प्रेम बाईसा यांचा २८ जानेवारीच्या रात्री जोधपूरमधील एका रुग्णालयात संशयास्पद मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा खळबळजनक दावा खासदार हनुमान बेनीवाल यांनी केला आहे. ते नागौरचे खासदार आहे. साध्वीच्या मृत्यूनंतर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर झालेल्या एका पोस्टने आणि जुन्या वादाने या प्रकरणातील गूढ अधिक वाढवले आहे.
साध्वी प्रेम बाईसा यांना गेल्या काही दिवसांपासून ताप होता. त्यांच्या उपचारासाठी एका कंपाउंडरला त्यांच्या आश्रमात बोलावण्यात आले होते. त्या कंपाउंडरने त्यांना एक इंजेक्शन दिले, त्यांनतर त्यांची प्रकृती वेगाने बिघाडली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
साध्वींच्या निधनानंतर साधारण ४ तासांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. यात अग्निपरीक्षेचा उल्लेख करण्यात आला आहे. आता प्रश्न असा की त्यांचा तर मृत्यू झाला मग ही पोस्ट कोणी शेअर केली? ही पोस्ट म्हणजे आत्महत्येचे संकेत आहेत की त्यांना काही सुचवायचे होते, अशी चर्चा होता हाये. याचा तपास आता पोलीस करत आहे.
नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी मुख्यमंत्री आणि राजस्थानच्या पोलीस महासंचालकांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी याप्रकरणी एक्सवर एक पोस्ट केली आहे. पोस्ट करत म्हटले की, “जोधपूरच्या रुग्णालयात साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद मृत्यू होणे अत्यंत दुःखद आहे. ही घटना सामान्य वाटत नाही, याची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे.
साध्वींच्या पार्थिवाचे पोस्टमार्टम करण्यात येणार आहे, त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. प्राथमिक चौकशीत तापाचे कारण सांगितले जात आहे. मात्र खासदार बेनीवाल यांचा दावा आणि सोशल मीडियावरील गूढ पोस्टमुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. आता काय नेमकं कारण समोर येणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







