दौरा (राजस्थान) (वृत्तसंस्था) : देशभरात ठिकठिकाणी धुळवड, रंगपंचमी देखील साजरी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण राजस्थानमध्ये होळीच्या सणाला गालबोट लागले आहे. होळीच्या आधी रंग लावू नका असे म्हणणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या दौरा जिल्ह्यातल्या रालावस गावात ही घटना घडली आहे. रालावस गावात हंसराज या २५ वर्षीय तरुण ग्रंथालयामध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता. त्याच दरम्यान गावातील अशोक, बबलू आणि कालूराम हे तिघे हंसराजला होळीचा रंग लावण्यासाठी ग्रंथालयामध्ये घुसले. मला रंग लावू नका असे म्हणत हंसराजने रंग लावण्यास विरोध केला.
या गोष्टीचा अशोक, बबलू आणि कालूराम यांना खूप राग आला. रागाच्या भरात तिघांनी मिळून हंसराजला लाथाबुक्यांनी आणि बेल्टने मारहाण केली. त्यानंतर तिघांपैकी एकाने हंसराजचा गळा दाबून त्याचा खून केला. या घटनेचा हंसराजच्या कुटुंबातील नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी निषेध करत आंदोलन केले.
बुधवारी हा प्रकार घडला. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्रीपासून गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन केले. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी, मृत हंसराजच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची भरपाई द्यावी आणि त्याच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.







