बिकानेर (राजस्थान) : जिल्ह्यातील खाजूवाला पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावात शाळेमध्ये ९ वीत जाणाऱ्या मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर २ तरुणांनी आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेनंतर १६ वर्षीय मुलीने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २२ जानेवारीला पीडित मुलगी शाळेमध्ये जाण्यासाठी निघाली होती. त्याचवेळी याच परिसरात राहणाऱ्या दोन तरुणांनी तिचे अपरहण केले. त्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. सामूहिक बलात्कारानंतर मानसिक धक्का बसल्यामुळे चिंतेत येत पीडित मुलीने विष प्राशन केले. तिची प्रकृती बिघडल्यामुळे कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. बुधवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. यामधील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली तर दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पीडित मुलीच्या भावाने तक्रारीत सांगितले की, त्याची बहीण २२ जानेवारीला शाळेत जात होती. गावातील दोन तरुणांनी रस्त्यात तिला अडवले आणि जबरदस्ती बाईकवर बसवून नेले. आरोपींनी तिला एका निर्जनस्थळी नेले. सर्वात आधी आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी पळून गेले. घरी आल्यानंतर तिने २३ जानेवारीला विष प्राशन केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.







