नाशिक (विशेष प्रतिनिधी) : जिल्ह्यातील देवळा शहरातील मालेगाव नाक्यावरील पाणीपुरी आणि भेळ बनविणाऱ्या टपरीमधील सिलिंडरच्या नळीमधून गॅसगळती झाल्याने टपरीने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी (दि.८) दुपारच्या सुमारास घडली. आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली असून, काही नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, गाडी मालक श्रवण रामेश्वर साळवे याने पळ काढल्याने याच्या हाताला किरकोळ भाजले असून, त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, पोलीस नाईक रामदास गवळी, अरुण अहिरे, प्रकाश सोनवणे, संदीप चौधरी तसेच गॅस एजन्सीचे कर्मचारी आदींनी घटनास्थळी धाव घेत अग्निरोधक आणि पाण्याच्या साहाय्याने आग विझविली.
या घटनेमुळे शहरात चौकाचौकात थाटण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गाड्यांवर सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना न करता सर्रास सिलिंडरचा वापर केला जात असून, नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस विभागाने अशा हातगाड्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.






