फडणवीसांचा बॉम्ब : मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून नवाब मलिकांनी साडेतीन कोटींची जमीन २० लाखांत घेतली

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : गेल्या महिन्याभरापासून मुंबईत एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये सुरू असलेला आरोप-प्रत्यारोपाचा खेळ आता शिगेला पोहोचला आहे. नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांनी एकमेकांविरोधात आरोप केले आहेत. एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या अनुषंगाने भाजपावर देखील आरोप केले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त २० लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच, सलीम पटेल कोण होता, त्यानं तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का विकली? असे सवाल देखील नवाब मलिक यांना केले आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी घोषणा केली होती की काही गोष्टी दिवाळीनंतर तुमच्यासमोर आणेन. थोडा उशीर झाला. कारण कागद गोळा करत होतो, काहींचे पत्रकार परिषदेचे दिवस आधीच बुक होते. मी सांगणार आहे ती सलीम जावेदची स्टोरीही नाही आणि इंटरव्हलनंतरचा सिनेमाही नाही. फार गंभीर आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलेला हा मुद्दा आहे.

 



सरदार शहावली खान हा १९९३ चा गुन्हेगार आहे. याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो तुरुंगात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा कायम केली आहे. टायगर मेमनच्या नेतृत्वात तो फायरिंगच्या ट्रेनिंगमध्ये सहभागागी झाला. बीएसई आणि पालिकेमध्ये बॉम्ब कुठे ठेवायचे, याची रेकी त्यानी केली होती. टायगर मेमनच्या घरी बॉम्बब्लास्टच्या कारस्थान मांडणीवेळी ते उपस्थित होते. टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये त्यानी आरडीएक्स भरलं. साक्षीदारांनी याविषयी साक्ष दिल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली.

कुर्ल्यामध्ये २.८० एकर म्हणजेच १ लाख २३ हजार स्क्वेअर फूटची जागा जिला गोवावाला कंपाऊंड असं म्हटलं जातं. कुर्ल्यात एलबीएस रस्त्यावर ही जागा आहे. या जमिनीची एक रजिस्ट्री सॉलिडस नावाच्या कंपनीसोबत झाली. मरियमबाई गोवावाला, मुदीरा प्लंबर या दोघांकडून सलीम पटेल हे पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर आहे. विक्री करणारा सरदार शहावली खान आहे. म्हणजे या दोघांनी मिळून या जमिनीची विक्री सॉलिडस कंपनीला केली. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची आहे. घेणाऱ्याची सही फराज मलिक नावाच्या व्यक्तीची आहे. या सॉलिडसमध्ये २०१९मध्ये खुद्द नवाब मलिक देखील होते. आजही त्यांच्या कुटुंबाचे लोक त्यात आहेत.

कुर्ल्याच्या फोनिक्स मार्केटच्या जमिनीवेळीच एलबीएस रोडवरची ही जमीन रेडीरेकनर रेट ८५०० आणि मार्केट रेट २०५३ रुपये प्रती चौरस फूट दराने घेतली गेली. ही जमीन ३० लाखात खरेदी केली गेली. त्यातही १५ लाखांचं पेमेंट हे मालकाला न मिळता त्यांचा पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर सलीम पटेलच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर १० लाख रुपये शहावली खान ज्याला सरदार खान म्हणतात, त्याला मिळाले. त्यातही ५ लाख नंतर मिळतील असं लिहिलं. म्हणजे २० लाखात एलबीएस रोडवर ३ एकरच्या जमिनीचा व्यवहार झाला.

२००३मध्ये हा सौदा झाला, तेव्हा नवाब मलिक मंत्री होते. अंतिम रजिस्ट्री झाली त्याच्या काही दिवस आधी नवाब मलिक यांना पद सोडावं लागलं. पण तुम्हाला माहिती नव्हतं की सलीम पटेल कोण आहे? मुंबईच्या गुन्हेगारांकडून तुम्ही जमीन खरेदी का केली? मुंबईत बॉम्बब्लास्ट करणाऱ्यांकडून तुम्ही जमीन का खरेदी केली? अशा कोणत्या कारणामुळे त्यांनी एलबीएसमधली ३ एकरची जमीन इतक्या स्वस्तात दिली. या आरोपींवर टाडा लागला होता. टाडाच्या कायद्यानुसार आरोपीची सगळी मालमत्ता सरकार जप्त करते. मग टाडाच्या आरोपीची जमीन जप्त होऊ नये, यासाठी तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का? शेवटी त्यांनी जाहीर केले की, मी ही कागदपत्र संबंधित यंत्रणेकडे देईन. हे सगळे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनाही मी देणार आहे. त्यांनाही कळेल, की त्यांच्या मंत्र्यांनी काय करून ठेवलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here