जळगाव (क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : जामनेर तालुक्यातील कुंभारी तांडा येथील १७ वर्षांचा मुलगा अन् १६ वर्षांच्या मुलीने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१०) सकाळी उघडकीस आली. दरम्यान, या घटनेने खळबळ उडाली असून प्रेमप्रकरणातून या दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पहूर पोलिसांकडून तपास सुरु आहे.
कुंभारीतांड्यातून मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका नातेवाइकांकडे कार्यक्रम असल्याने सर्वजण कार्यक्रमासाठी गेले होते. घरी कुणी नसतांना तानिया चव्हाण या १६ वर्षांच्या मुलीने घरात विष प्राषन करून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी तिचा अंत्यविधी करण्यात आला. तर गावातीलच पवन जाधव या १७ वर्षीय युवकाने गावाबाहेरील एका शेतात विष प्राषन करून आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला.
दोघांचे प्रेमप्रकरण असल्याची चर्चा गावात आहे. याबाबत पोलिस पाटील किंवा कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती न देता दोघांचा अंत्यविधी केला. त्यामुळे पहूर पोलिस ठाण्याचे अधिकारी याबाबत अनभिज्ञ होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गावात धाव घेतली व चौकशी केली. मुलाचा मोबाईल ताब्यात घेतला असून तानिया चव्हाण या मुलीच्या मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संदेश पवन जाधव याने त्याच्या काकाला पाठवला असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.






