जम्मू (ऑल इंडिया उपसंपादक राजन चौधरी) : येथील कुलगाममध्ये आज सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यापैकी एका चकमकीत द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेचा कमांडर अफाक सिकंदर ठार झाला. काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ही माहिती दिली.
कुलगाममधील पुंबई आणि गोपालपोरा गावात ही चकमक झाली होती. दोन्ही ठिकाणी अजूनही चकमक सुरूच आहे. श्रीनगरच्या हैदरपोरामध्ये १५ नोव्हेंबरला सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या वर्षात आतापर्यंत १३५ हून अधिक दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे. ३८ विदेशींसह १५०-२०० दहशतवादी अजूनही काश्मीर खोऱ्यात सक्रिय आहेत.
जम्मू काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलाने मोठी मोहिम हाती घेतली आहे. बुधवारीदेखील दक्षिण काश्मीरचे पुलवामा जिल्ह्यात लष्कर ए तोयबा दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आईईडी ताब्यात घेण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात दहशतवादी हल्ल्यात तब्बल १२ जवान शहिद झाले तर १३ नागरिकांची हत्या करण्यात आली. यामध्ये व्यावसायिक, कामगार आणि शिक्षकांचा समावेश आहे. तर जवानांनी २० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.






