नाशिक (विशेष प्रतिनिधी) : मालेगाव शहरातील रझा अकादमीच्या कार्यालयावर नाशिक पोलिसांनी छापा टाकला आहे. शुक्रवारी झालेल्या दगडफेकीप्रकरणी आता बंद पुकारणारी रजा अकॅडमी ही संघटना पोलिसांच्या रडार आली आहे. स्थानिक पोलिसांनी मंगळवारी रात्री संघटनेच्या लल्ले चौकातील कार्यालयावर छापा मारीत दोन तास झडती घेतली. या झडतीत बंदचे आवाहन करणारी पत्रके व दस्तावेज पोलिसांनी जप्त केले असून अकादमीचे प्रमुख पदाधिकारी हे मालेगाव सोडून फरार झाल्याचे देखील समोर आले आहे.
त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ रजा अकॅडमी संघटनेने बंदची हाक दिली हाेती. दुपारनंतर बंदला हिंसक वळण लागले. अचानक दगडफेक व ताेडफाेडीच्या घटना घडल्याने रझा अकादमी ही संघटना संशयाच्या भाेवऱ्यात आली होती. पाेलिसांनी पंचासमक्ष कार्यालयाचे कुलूप ताेडून झडती घेतली. यावेळी कार्यालयातील संगणक, रजिस्टर, धार्मिक पुस्तके आदींसह बंदचे आवाहन करणारी ऊर्दू भाषेतील काही पत्रके पथकाच्या हाती लागली आहेत. यासह एक रजिस्टर व काही पुस्तके चाैकशीकामी ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी तातडीने पावले उचलत येथील परिस्थिती आटोक्यात आणली परंतु त्यानंतर मात्र काही प्रमाणात या दंगलीचे राजकारण होऊ लागले काल मंगळवारी मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार मौलाना यांनी मालेगाव येथे झालेल्या दंगलीमध्ये काही पक्षांचा हात असल्याचा आरोप देखील केला होता आणि त्यानंतर मात्र पोलिस प्रशासनाने अधिक धरपकड कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणी शहर पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांचे अंगरक्षक पिंट्या जोरदार पावरा (३२) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यांच्या फिर्यादीवरून अज्जू लसणवाला, फारुख काल्या, तौसिफ शेख मुसा, नाविद शेख, जाहीद कच्छी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचप्रमाणे जखमी झालेले पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या फिर्यादीवरून ३३ जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यातील मो. इम्रान मो. उस्मान (२५), शेख आसिफ शेख करीम (१९), मो.रमजान अब्दुल रहिम (२५), मो हारुण हबीबुर रहेमान अन्सारी (२५), फैजल अहमद शकील अहमद (२१), मो.आसिफ मो.युसूफ (४२), तौसिफ खान पूर खान (१९), उबेद समसुद्दीन अन्सारी (२०), शहवाज अहमद जमील अहमद (२०), मोईन अनिस मलिक (२०), मोईनुद्दीन अब्दुल कदीर (३४), अफताब एजाज वेग (२१), शेख अलीम शेख सलीम (२६), रमजान खान शाहीर खान (२१), अफताब आलम हासम (४२), रईस अहमद अब्दुल सम (४६), आसिफ अहमद निहाल अहमद (३४), अरबाज शेख सरदार (१९) या १८ संशयितांना अटक करण्यात आली आहे.
विविध गुन्ह्यांखाली ज्ञात-अज्ञात शेकडो दंगलखोरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील २२ जणांना अटक होऊन संबंधितांना पोलिस कोठडी मिळाली आहे. एकूण अटक झालेल्यांची संख्या ३३वर गेली आहे. त्यात राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. गुन्हे दाखल झालेले काही राजकीय पक्षाचे नेते फरार झाले आहेत. सहा पोलीस पथके त्यांचा शोध घेत आहेत.






