मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मावशीने ओतले ९ वर्षांच्या भाचीवर उकळलेले पाणी

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : मालवणी पोलिसांनी ३० वर्षीय महिलेला अटक केली आहे. ९ वर्षीय भाचीवर उकळलेले पाणी ओतल्याचा तिच्यावर आरोप आहे. मुलीने कपडे नीट न धुतल्याच्या रागातून तिने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. काही स्थानिकांनी मुलीच्या अंगावर भाजल्याच्या जखमा बघितल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या मुलीची प्रकृती स्थिर आहे.

आरोपी मुलीची मावशी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. १५ नोव्हेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आला. एका स्थानिकाने नाव न उघड करण्याच्या अटीवर टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, त्याच्या घरमालकाने त्याला मुलीबद्दल सांगितले. त्या मुलीला मावशीच्या घरी पुन्हा जायचे नाही, असे त्याने सांगितले. ज्यावेळी मुलीबद्दल चौकशी केली असता, तिने आपल्या शरीरावरील जखमा दाखवल्या. मुलीच्या खांद्यावर, कान, मान आणि पायावर जखमा होत्या. ते पाहून आम्हाला धक्काच बसला. हे असे कुणी करू शकते का, असा प्रश्न आम्हाला पडला, असे स्थानिकाने सांगितले.

स्थानिकाच्या म्हणण्यानुसार, याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यानंतर दोन पोलीस कॉन्स्टेबल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुलीच्या अंगावरील जखमा बघितल्या. त्यानंतर त्यांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला बोलावून घेतले आणि तिच्या मदतीने मुलीला रुग्णालयात नेले. पोलिसांनी मुलीला विचारणा केली. त्यानंतर मुलीने आपल्यावरील गुदरलेला प्रसंग सांगितला. कपडे नीट धुतले नाहीत म्हणून मावशीने अंगावर गरम पाणी ओतले. तिच्या आईला मानसिक आजार आहे. त्यामुळे मुलगी मावशीकडे असते. पोलिसांनी महिलेला अटक केली. मुलीला नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थिर आहे, असे पोलिसांनी सांगितले. मुलीला तिच्या मोठ्या भावाकडे सोपवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी महिलेला अटक करून तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here