मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : बांगलादेशातून आणून तब्बल पाच हजारांहूनही जास्त मुलींना वेश्या व्यवसायाच्या चिखलात लोटणाऱ्या विजय कुमार दत्त याला आज अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने स्वतः मुलींना देहव्यापारात ढकलल्याची कबुली दिलीय. २५ वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात आलेला आरोपी विजयला साथीदार बबलूसह एसआयटीच्या पथकानं बाणगंगा परिसरातील कालिंदी गोल्ड सिटी येथून अटक केले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विजयने मुंबईतील नालासोपारा परिसरातील दाट वस्तीत आपला अड्डा बनवला होता. त्याच्या उज्ज्वल, बबलू आणि सैजल या अन्य साथीदारांच्या मदतीने इंदूरला वेश्या व्यवसायाचं केंद्र बनवण्याच्या प्रयत्नात होता. इंदूरहून सुरत, राजस्थान, मुंबई आणि इतर प्रमुख ठिकाणी मुलींचा पुरवठा करणारी साखळी तयार करण्याचा देखील त्याचा प्रयत्न होता.तसेच, त्याने भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रही तयार केलेत.बायकोला भेटायला जाण्याच्या कारणातून तो अनेकदा बांगलादेशला दौरे करायचा.
विजय बांगलादेशातील शबाना आणि बख्तियार यांच्या मदतीने गरीब घरातील मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचा. नोकरी देण्याचं आमिष दाखवून आरोपी संबंधित मुलींना अवैध पद्धतीनं भारतात आणायचा. येथे आणल्यानंतर आरोपी काही दिवस या मुलींना आपल्या सोबत ठेवायचा. तसेच त्यांना वेश्या व्यवसायासाठी तयार करायचा. अनेकदा त्यांच्यावर तोच बलात्कार करायचा. पीडित मुलींनी पुन्हा बांगलादेशला जाण्याचं विचारता त्यांना गोळी घालून ठार मारण्याची धमकीही विजय देत असे.
दरम्यान, विजयने मागील २५ वर्षामध्ये सुमारे ५ हजारहून जास्त मुलींना देहव्यापारात अडकवले आहे. धक्कादायक म्हणजे त्यानं आजपर्यंत दहा मुलींशी लग्न केलं आहे. तसेच त्याला १०० हून जास्त गर्लफ्रेंड आहेत. या सर्वांना त्यानं वेश्या व्यावसाय करण्यास भाग पाडलं आहे. तसेच, त्याचं कमिशनही स्वत:कडेच ठेवत होता. दरम्यान, मागील काही दिवसांपासून या आरोपीचा मुंबई पोलिस शोध घेत होते. मात्र, तो हाती लागत नव्हता. पण, यावेळी पोलिसांनी नालासोपारा परिसरात धाड टाकल्यानंतर आरोपी विजय इंदूरला पसार झाला होता. मात्र, एसआयटी पथकाच्या मदतीने आरोपी विजयला अटक केली आहे.






