ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : महापालिका कंत्राटी वाहन चालकाकडून ३ हजाराची लाच घेणारा प्रभारी वाहन व्यवस्थापक यशवंत सगळे याला पालिका आयुक्तांनी निलंबित केले.
उल्हासनगर महापालिका वाहन विभागात तब्बल ५६ कंत्राटी वाहन चालक ठेकेदारामार्फत घेण्यात आले. यातील पाणी पुरवठा विभागातील भुयारी गटारीचे काम करणाऱ्या ८ कंत्राटी वाहन चालकाकडून वेळेत पगार काढणे व इतर सुखसुविधा देण्यासाठी दरमहा ३ हजाराची लाच प्रभारी वाहन व्यवस्थापक यशवंत सगळे मागत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सगळे यांच्यासह अन्य एका कंत्राटी वाहनचालकाला ३ हजाराची लाच घेतांना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. याप्रकारने महापालिकेतील कंत्राटी कामगारांचे भिषण स्वरूप पुढे आले. कंत्राटी कामगारांची पिळवणूक करणाऱ्या अश्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
महापालिकेतील अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग, पाणी पुरवठा विभाग, नागरी सुविधा केंद्र, आरोग्य विभागात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांच्या मदतीला ४५ वॉर्डन तसेच शहरातील साफसफाई साठी कंत्राटी पद्धतीने एकून २७० सफाई कामगार घेण्याला महापालिकेने मंजुरी दिली. एकूणच शेकडो कामगार कंत्राटी पद्धतीने ठेकेदारा मार्फत घेतले जात आहेत. महापालिका कामगार संघटनेने कंत्राटी कामगार नियुक्तीला वेळोवेळी विरोध केला असून कंत्राटी कामगारांवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केल्या पेक्षा थेट कामगार भरती करण्याची मागणी कामगार संघटना करीत आहेत. पालिकेत ७० टक्के अधिकारी प्रभारी असून कंत्राटी कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, महापालिकेचा कारभार प्रभारी अधिकारी व कंत्राटी कामगारांच्या हाती जात असल्याची टीका होत आहे. तसेच याप्रकारने महापालिका विभागात सावळागोंधळ उडाला आहे.
महापालिकेत अनेक अधिकाऱ्यांना लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. असे अधिकारी पुन्हा पालिका सेवेत दाखल झाल्यावर त्यांना महत्वाचा पदभार दिला जात नाही. असा नियम आहे. मात्र हा नियम पायदळी तुडवून अश्या लाचखोर अधिकाऱ्यांना महत्वाच्या पदाचा पदभार दिला जात असल्याने, महापालिका कारभारावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे






