इचलकरंजी (रिपोर्टर मनोज सोनवले) : शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावर बंद आणि बेवारस स्थितीत अनेक वाहने लावणेत आलेली होती. याबाबत शहरातील विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या वतीने तक्रारी होत होत्या. सदर तक्रारीस अनुसरून प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी वृत्तपत्राद्वारे शहरातील नागरिकांना (ज्यांच्या मालकीची वाहने असलेल्यांना) अशी वाहने ३१ जानेवारी पर्यंत उचलण्याचे आवाहन केले होते.
सदर मुदतीनंतर आज दि.२ फेब्रुवारी पासून मुख्य अधिकारी डॉ. ठेंगल यांच्या मार्गदर्शना खाली शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहकार्याने आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांच्या नेतृत्वा खाली शहरातील सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावर बेवारस आणि बंद स्थितीत लावलेली वाहने उचलण्याची मोहीम राबविण्यात आली.
आजच्या या मोहिमेत शहरातील विविध ठिकाणची ९ वाहने उचलुन जप्त करण्यात आली. जप्त करणेत आलेली वाहने २८ फेब्रुवारी पर्यंत मुळ मालकांना कागदपत्रे सादर केलेनंतर दंड भरून परत देणेत येणार आहेत. तसेच २८ फेब्रुवारी नंतर उर्वरित वाहनांची लिलावाद्वारे विक्री करणेत येणार आहे. तरी अद्यापही ज्यांनी वाहने रस्त्यावर लावणेत आलेली आहे त्यांनी आपापली वाहने उचलून घ्यावीत अन्यथा नगरपरिषद प्रशासनाकडून अशी बंद आणि बेवारस वाहने उचलण्यात येणार आहेत. या मोहिमेत अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे यांचेसह अतिक्रमण आणि आरोग्य विभागा कडील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
दरम्यान शहरात प्लॅस्टिक बंदी मोहीमेअंतर्गत एकुण प्लॅस्टिक १७६ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून, संबंधितांवर कारवाई करत ५२१०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.
Home राज्य पश्चिम महाराष्ट्र इचलकरंजी शहरात सार्वजनिक ठिकाणी बंद आणि बेवारस वाहने उचलण्याची मोहीम सुरू







