इंदापूर (प्रतिनिधी गणेश धनवडे) | इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब येथे वाणिज्य शाखा बॅच २०१३-२०१६ च्या विद्यार्थ्यांचे ‘माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन २०२६’ अत्यंत उत्साहात पार पडले. तब्बल दहा वर्षांनंतर मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने महाविद्यालयाचा परिसर आठवणींच्या हिंदोळ्यावर तल्खलला होता.
वीरसिंह रणसिंग कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “माजी विद्यार्थ्यांनी खडतर परिस्थितीवर मात करत विविध क्षेत्रांत केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःचा विकास न साधता महाविद्यालयाशी असलेले नाते कायम जपावे.”
स्नेहसंमेलनानिमित्त जमलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील गमतीजमती, अनुभव आणि मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला ‘कलर प्रिंटर’ भेट दिला. दहा वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर एकमेकांना भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळिग, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. सुहास भैरट, डॉ. तेजश्री हुंबे, प्रा. सोनाली चव्हाण यांच्यासह सेवानिवृत्त प्राध्यापक अरुण कांबळे, प्रा. डॉ. दिलीप मोरे, प्रा. डॉ. बबन भापकर, प्रा. मारुती जाधव आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. या स्नेहसंमेलनामुळे जुन्या मैत्रीला नवसंजीवनी मिळाली असून, भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला.







