औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत बिनदिक्कत कॉपीचे प्रकार सुरू असून मुंबईसह इतर विभागांत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. दहावी, बारावी परीक्षेसाठी यंदा विद्यार्थी शिकत असलेल्या शाळा, कॉलेजमध्येच परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.
बोर्डाने केलेली ही सोय परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पचनी पडली आहे. शनिवारी झालेल्या केमिस्ट्री आणि राज्यशास्त्राच्या परीक्षेवेळी एकूण ४१ कॉपी प्रकरणे उघडकीस आली. औरंगाबाद विभागात केमिस्ट्रीच्या परीक्षेवेळी तब्बल १५ तर अमरावती विभागात दुपार सत्रातील राज्यशास्त्राच्या परीक्षेवेळी १२ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले आहे.
४ मार्चपासून बारावीची परीक्षा सुरू झाली असून आतापर्यंत पार पडलेल्या परीक्षांमध्ये मिळून एकूण १३९ विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तसेच कॉपीबहाद्दरांचा अमरावती पॅटर्न यंदा पाहायला मिळत असून आतापर्यंत पार पडलेल्या बारावीच्या परीक्षांमध्ये सर्वाधिक कॉपीप्रकरणे अमरावती विभागात घडली आहेत. केमिस्ट्री, राज्यशास्त्र, होम मॅनेजमेंट, फिजिक्स, इंग्रजी या विषयांच्या परीक्षांमध्ये मिळून एकटय़ा अमरावती विभागातून ९४ कॉपीबहाद्दर पकडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत पुणे आणि कोकण विभागात एकही कॉपी प्रकरण उघडकीस आलेले नाही.







