जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : शहरातील शिवाजी नगर भागात लहान मुलांच्या खेळण्यावरुन झालेल्या वादामध्ये महिलांमध्ये चापटाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांकडून समजलेली सविस्तर माहिती अशी की, शिवाजीनगर भागात कुटुंबियांसह राहणाऱ्या सुमय्याबी अय्युब खान (वय-२७) यांच्या अंगणात मंगळवारी २४ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास लहान मुले चकरी खेळ खेळत असतांना चकरी ही शेजारी राहणाऱ्या मंगला जाधव यांच्या घरावर गेली.
या कारणावरून मंगला जाधव आणि लक्ष्मी जाधव यांनी सुमय्याबी अय्युब खान यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी सुमय्याबी यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात मंगला जाधव आणि लक्ष्मी जाधव यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संदीप परदेशी करीत आहे.







