शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) : शिर्डी संस्थानच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आपण वेळप्रसंगी विधानसभेत आवाज उठवू तसेच हा प्रश्न सुटावा म्हणून सर्वच स्तरांवर प्रामाणिकपणे प्रयत्न करु. १०५२ प्रमाणेच या ५९८ कामगारांना स्थायी नेमणूक देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू, अशी ग्वाही गंगापूर- खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी दिली.
शिर्डी संस्थानमधील आकृतीबंधामधील उर्वरीत ५९८ पात्र कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना आमदार प्रशांत बंब यांनी दिले. यावेळी भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा, नवनाथ थोरे, निखील पिपाडा आदी उपस्थित होते. यावेळी बानायत तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली.
हे सर्व कर्मचारी फार वर्षांपासून पात्र असुनही त्यांना न्याय मिळाला नसल्याने ज्यावेळी १०५२ कर्मचारी कायम झाले, तेव्हापासुनचा फरकही मिळावा यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार बंब यांनी दिली. निवेदनात म्हटले आहे की, १०५२ कामगारांना श्री साईबाबा संस्थान आस्थापनावर कंत्राटी पद्धतीने ऑर्डर दिली आहे. ७ ऑगस्ट २००९ रोजी शासन मान्यता मिळालेल्या मंजूर आकृतीबंध तयार करण्यात आल्यानुसार १०२६ जण स्थायी पदात बसले व त्यातील राहिलेले ५४० कामगार हे स्थायी पदात बसले. १६८७ पैकी १२१ कामगार स्थायी पदातून बाद झाले. आतापर्यंत ६३५ पैकी अधिनियमातील राहिलेल्या ५९८ जणांना स्थायी कर्मचारी म्हणुन नियुक्ती दिलेली नाही.
याबाबत संस्थानचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांच्याशीही चर्चा करू, असे आश्वासन यावेळी आमदार बंब यांनी दिले. यावेळी डॉ. पिपाडा म्हणाले, की कर्मचाऱ्यांच्या सर्यमाचा अंत पाहु नये. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने उदासीनता दिसुन येत आहे. याबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा. २००४ साली आम्ही शिर्डी ते मंत्रालय अशी पायी दिंडी काढण्याचे आंदोनल करण्याची घोषणा केल्यानंतर १०५२ कामगारांना न्याय मिळाला. उर्वरित कामगारांना टप्प्या – टप्प्याने घेऊन असे आश्वासन दिले होते, परंतु तसे झाले नाही, असे ते म्हणाले.