नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : रविवारी (१९ जून) झालेल्या दोन अपघातांमुळे शीव पनवेल महामार्गावर खारघर ते कळंबोलीपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. यात कामोठे येथे ५ गाड्यांच्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नवी मुंबई कामोठे उड्डाणपुलावर रविवारी सकाळी आठच्या सुमारास एक विचित्र अपघात घडला. उड्डाणपुलावर बंद पडलेल्या ट्रकचे काम सुरू होते. त्याच वेळी मागून भरधाव येणाऱ्या व्हॅगन आर गाडी, इनोवा, एक ट्रक आणि एसटी महामंडळाची शिवनेरी बस एकमेकांवर धडकल्या. त्यात व्हॅगनआरमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
कारमधील इतर सहप्रवासी व इनोव्हामधील प्रवासी असे तीन ते चार जण जखमी झाले आहेत. या जखमींवर जवळच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्हॅगन आरमधील जखमींना बाहेर काढता न आल्याने शेवटी गॅस कटरने गाडीचा मोठा भाग कापून प्रवाशांना बाहेर काढावं लागलं.
या शिवाय याच मार्गावर खारघर उड्डाण पुलावर एक ट्रक नादुरुस्त झाल्याने किरकोळ अपघात झाला. मात्र, सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली. त्यातच पाऊस पडत असल्याने सर्वाधिक दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली.