पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे शहरात आगमन होत असताना दर्शनासाठी झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी तिन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना येरवडा येथील इंदिरानगरमधील दत्त मंदिरासमोर बुधवारी (दि.२२) दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी वाघोली येथे राहणार्या एका २७ वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी फिर्यादी इतर दोन महिलांसह इंदिरानगर येथील दत्त मंदिरासमोर थांबल्या होत्या.
माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेत असताना अनोळखी महिलेने त्यांच्या गळ्यातील ३ तोळे वजनाचे ९० हजार रुपयांचे मंगळसुत्र चोरून नेले. तसेच दुसर्या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे ७५ हजार रुपयांचे मंगळसुत्र तसेच आणखी एका महिलेच्या गळ्यातील १५ हजार रुपयांची सोन्याची चैन असे एकूण १ लाख ८० हजार रुपयांचे दागिने हिसका मारून चोरुन नेले. पोलीस उपनिरीक्षक मगदुम तपास करीत आहेत.







