उस्मानाबाद (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिखली पाटी येथील बंद असलेल्या हॉटेलात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी (२१ ऑगस्ट) दुपारच्या सुमारास चिखली पाट परिसरात असलेल्या बंद हॉटेलचे दार उघडल्यानंतर महिलेचा मृतदेह आढळून आला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. ही महिला हे हॉटेल चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.
ज्या शेतकऱ्याच्या शेतातील रस्त्याकडची जागा भाड्याने घेऊन एक महिन्यापूर्वी हे हॉटेल थाटण्यात आले होते. त्या शेतकऱ्यानेच बेंबळी पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन ही माहिती दिली आहे. हॉटेल बंद का आहे? या संशयावरुन त्याने पोलिसांना माहिती दिली. यानंतर हॉटेल उघडताच आत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महिलेची ओळख पटली आहे. तिचे नाव सविता व्यंकट देशमुख (४५ वर्षे अंदाजे) असल्याची माहिती आहे. ती हे हॉटेल चालवत असल्याची माहिती आहे.
सध्या तपासासाठी घटनास्थळाचा ताबा पोलिसांनी घेतला असून घटनास्थळावर पंचनामा आदी कारवाई पोलीस करत आहेत. यानंतर उत्तरीय तपासणीसाठी शासकीय आरोग्य केंद्रात महिलेचा मृतदेह पाठवला जाईल. असे बेंबळी बिट अंमलदार रविकांत जगताप यांनी सांगितले आहे. यास चिखलाचे नवनियुक्त बिट अंमलदार सचिन कपाळे यांनी दुजोरा दिला आहे.







