नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सीमेवरील वाद चिघळला असून आज एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाले आहेत. ही घटना धक्कादायक आहे. भारत आणि चीनमध्ये शेवटचा गोळीबार 1967 मध्ये झाला होता. म्हणजे 53 वर्षांपूर्वी. ही हिंसा सिक्किममध्ये झाली होती. चीन अशासाठी चिडला होता कारण भारत आपल्या क्षेत्रामध्ये 1962 च्या युद्धानंतर सैन्यासाठी तयारी करत होता. 1967 च्या छोट्या युद्धामध्ये भारताचे 80 जवान शहीद झाले होते तर चीनचे 400 सैनिक ठार झाले होते. कारण 1967 नंतर गेल्या 4 दशकांपासून एलएसीवर असलेली शांतता काल रात्री भंग पावली आहे.
चीनच्या सैन्याकडून झालेल्या हिंसक हल्ल्यात भारताने एक अधिकारी आणि दोन जवान गमावले आहेत. असे 70 च्या दशकानंतर पहिल्यांदाच झाले आहे. एलएसी सीमेवर शेवटची गोळी 1967 मध्ये झाडली गेली होती. यावेळीही गोळी झाडली गेली नाही पण जवान शहीद झाले आहेत.
कितीही तणावाची परिस्थिती असली तरीही सीमेवर गोळीबार किंवा कोणतीही अनुचित घटना न घडल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चीनची स्तुती केली होती. त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, चीनच्या सीमेवर एकही गोळी चालली नाही, हे दोन्ही देशांमधील परिपक्वतेचे लक्षण आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात टीका आणि विरोधाचा सामना करावा लागत असल्याने चीन तणावात आहे. यामुळे चीनमधील उत्पादनांची मागणीही घटलेली आहे. यामुळे चीनच्या लोकांचा विरोधही सहन करावा लागत असल्याने राष्ट्रवादाची लाट आणण्यासाठी आणि लोकांना त्यात गुंतवून ठेवण्यासाठी चीन भारत आणि तैवानसोबत तणाव वाढवू लागला आहे. यामुळे चीनने भारताच्या लडाखमध्ये घुसखोरी केली आहे. यावरून गेल्या दोन महिन्यांपासून वाद सुरु आहे. एकदा दोन्ही सैन्यादरम्यान दगडफेकही झाली आहे.






