मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : मल्याळम चित्रपट निर्माते शफी यांचे निधन झाले आहे. शफी यांचे खरे नाव रशीद एमएच होते. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अर्धांगवायूच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. शनिवारी मध्यरात्री कोची येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता विष्णु उन्नीकृष्णन यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून शफीच्या निधनाची माहिती दिली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शफी यांना १६ जानेवारीला पक्षाघाताचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. ९ दिवसांच्या उपचारानंतर २५ जानेवारी सकाळी १२.२५ वाजता शफी यांनी जगाचा निरोप घेतला. विष्णु उन्नीकृष्णन यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून शफी यांच्या निधनाची माहिती दिली आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शफीचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं की, “शफी सरांनी आपल्या मागे हास्य आणि संस्मरणीय किस्से सोडले, जे नेहमी लक्षात राहतील. श्रद्धांजली…”
शफीने २००१ मध्ये ‘वन मॅन शो’ या पहिल्या चित्रपटाद्वारे मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. २० वर्षांहून अधिक काळातील चित्रपट कारकिर्दीत त्यांनी दहाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी अभिनेते दिलीपसोबत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट केले. यात कल्याणरामन, मारीकुंडोरू कुंजाडू आणि टू कंट्रीज यांचा समावेश आहे. याशिवाय पुलिवल कल्याणम, थोम्मनम मक्कलम, मायावी आणि चतांबिनाडू ही त्यांची उत्कृष्ट निर्मिती आहे. २०२२ मध्ये आलेला आनंदम परमानंदम हा त्यांचा शेवटचा दिग्दर्शकीय उपक्रम होता.
कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, शफी यांचे पार्थिव कोचीच्या एडप्पल्ली येथील बीटीएस रोडवरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. रविवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत कोचीन सर्व्हिस को-ऑपरेटिव्ह बँक हॉल, कलूर येथे ठेवण्यात येणार आहे. जिथे लोकांना त्यांचे शेवटचे दर्शन येईल. रविवारी दुपारी ४ वाजता कलूर मुस्लिम जुमा मशिदीत त्यांच्या पार्थिवाची नमाज अदा करण्यात येणार असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.







