अहिल्यानगर (जिल्हा क्राइम रिपोर्टर अण्णासाहेब बनसोडे) : तांदळी दुमाला (ता. श्रीगोंदा) येथील अवैध दारू धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना महिला व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. सरपंच संजय निगडे यांच्या नेतृत्वाखाली गावातील शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन अवैध दारूचा गंभीर प्रश्न मांडला.
यावेळी माजी उपसरपंच राजेंद्र भोस, पोलीस पाटील अनिल शेळके, माजी उपसरपंच महेश भोस, ग्रामपंचायत सदस्य भरत शेळके, संतोष शिंदे, हरिभाऊ धावडे, आप्पा हराळ, संजय भागवत, मीना नवले, संजना धावडे, रेखाबाई घाडगे, प्रियंका बडे, रुक्मिणी बडे आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते. तांदळी दुमाला (ता. श्रीगोंदा) येथे अवैध दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. युवक व्यसनाच्या आहारी जात असल्याने त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
जागतिक महिला दिनी विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करुन गावात दारूबंदीचा ठराव पारीत करण्यात आला आहे. तरी देखील गावात छुप्या पध्दतीने दारु विक्री होत आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.







