कारवांची वाडी येथे कार एसटी बस अपघातात तरुणाचा मृत्यू

accident
file photo

रत्नागिरी (प्रतिनिधी) : शहरानजिकच्या कारवांचीवाडी परिसरात एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण किरकोळ जखमी झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला. जोरदार धडकेत कारचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वस्ती फायनान्स कंपनीची कार घेऊन पाच कर्मचारी चेंबूर (मुंबई) येथून रत्नागिरीकडे निघाले होते. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कारवांचीवाडी फाट्याजवळ त्यांच्या कारचा समोरून येणाऱ्या एसटी बसशी जोरदार अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा समोरील भाग पूर्णपणे चुरडला गेला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विकास नवसरे (वय ३४, रा. मुंबई) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो वाचू शकला नाही. विकास नवसरे हा ड्रायव्हर सीटच्या मागे बसला होता. तो स्वस्ती फायनान्सच्या युनिट मॅनेजर या पदावर कार्यरत होता. मध्यरात्री 12 वाजता ते सर्व मुंबईतून रत्नागिरीत यायला निघाले होते. कारवांचीवाडी फाट्यावर असलेले डायव्हर्जन गाडीचालकाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे समोरासमोर ठोकर झाली. हे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीसाठी उपस्थित रहायला आले होते.

अपघात होताच स्थानिक नागरिकांनी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मदतकार्य सुरू केले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.या अपघाताची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here