मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : वसई विरार आणि मिरा-भाईंदर परिसरात अंमली पदार्थ विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली अंमली पदार्थविरोधी पथकांनी गेल्या सहा महिन्यांत जोरदार मोहीम राबवली आहे. या कालावधीत तब्बल ५४ कोटी ९८ लाख २१० रुपयांचा अंमली पदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे.या मोहिमेत ८०३ गुन्हे दाखल करण्यात आले असून २१९ जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सांगतांना पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्यांमध्ये परदेशी नागरिकांचा, विशेषतः नायजेरियन नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. पोलिसांनी केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर परजिल्हा आणि परराज्यात जाऊन अंमली पदार्थ तयार करणारे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या मोहिमेत एमडी, चरस, गांजा, कोडीन पावडर यासारख्या महागड्या आणि प्राणघातक पदार्थांचा समावेश आहे. यात गांजा ४६ गुन्हे, एमडी ३६ गुन्हे, चरस आणि कोकन व उर्वरित गुन्हे असे मिळून ८०३ गुन्ह्यांमध्ये एकूण २१९ जणांना अटक, तर ७०४ जणांविरोधात सेवन प्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अमली पदार्थांचा पुरवठा रोखण्यासाठी तांत्रिक यंत्रणा, नागरी संवाद, गुप्तचर यंत्रणा आणि अधिक कठोर कायदेशीर कारवाया सुरू ठेवण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे







