जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी महाविद्यालयीन तरुण-तरुणींची वाढती गर्दी आणि त्यांच्या बेताल वर्तनामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मेहरूण तलाव, कांताई बंधारा, हिडन तलाव आणि मेहरूण बगीचा या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर प्रेमयुगल बसलेले दिसत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, या ठिकाणी काही तरुण-तरुणी सार्वजनिक ठिकाणी अनुचित वर्तन करत असल्याने कुटुंबांसह फिरायला येणाऱ्या लोकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळेत या परिसरात गर्दी वाढत असल्याने वातावरणावर परिणाम होत असल्याचेही नागरिक सांगतात.
पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त होत असून, सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखण्यासाठी संबंधित प्रशासनानेही नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. शहरातील सामाजिक वातावरण निरोगी राखण्यासाठी पालक, शैक्षणिक संस्था आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.







