ठाणे (उपसंपादक प्रफुल्ल शेलार) | भिवंडी तालुक्यातील केंद्र पडघा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जि.प. प्राथमिक शाळा चिंबीपाडा येथील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शिक्षणप्रेमी व शाळा व्यवस्थापन समितीचे श्री. प्रफुल्ल काळूराम शेबार यांनी शाळेला वॉटर फिल्टर (अक्वा) बसवून दिले आहे. त्यांच्या या लोकोपयोगी आणि संवेदनशील उपक्रमाबद्दल शाळा आणि गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.
शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी प्रफुल्ल शेबार यांनी दाखवलेली तत्परता आणि घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील शाळांच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ते नेहमीच मदतीचा हात पुढे करत असतात, अशी भावना यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
या उल्लेखनीय व समाजोपयोगी कार्याबद्दल मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या वतीने प्रफुल्ल काळूराम शेबार यांचा विशेष सत्कार व आभारपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल परिसरातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.







