मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्री) – अलीकडेच महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री श्री. नवाब मलिक यांनी उर्दू व इंग्रजी भाषेतून ट्विट करीत अल्पसंख्याक समाजातील तरुणांना या भरतीच्या प्रवेश प्रक्रियेकरीता सरकारतर्फे मोफत प्रशिक्षण देण्याची घोषणा केली ज्याचे समर्थन करत महाराष्ट्र सरकारने तसा आदेशच काढला.
या विषयावर भारत रक्षा मंचाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगत सिंह कोशयारी यांची शनिवार २९ ऑगस्ट २०२० रोजी भेट घेऊन या भेदभावाच्या राजकारणाविरुद्ध आणि हे राजकारण करणाऱ्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध कारवाई व्हावी असे निवेदन दिले. राज्यपाल महोदयांनी या विषयावर भारत रक्षा मंच च्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले की राज्यपाल या विषयावर उचित कारवाई करतील.
या निर्णयावर भारत रक्षा मंचाचे क्षेत्रीय संघटन मंत्री श्री. प्रशांत कोतवाल म्हणाले की या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच जाती धर्माचे लोक आजवर सलोख्याने आणि एकोप्याने राहत आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे भविष्यात अल्पसंख्य आणि बहुसंख्य समाजातील तरुणांच्यात दुरावा निर्माण होऊ शकतो ज्याने राज्यातील एकोप्याच्या परिस्थितीला निश्चित तडा जाईल. पुढे ते म्हणले की संविधानाने आपणां सर्वांना समानतेचा मंत्र दिला आहे आणि सरकार ने धर्मीक वा जातीय भेदभाव न करता हे प्रशिक्षण सर्वच तरुण उमेद्वारांकरीता खुले करावे.
भारत रक्षा मंचाच्या शिष्टमंडळात श्री. प्रशांत कोतवाल, क्षेत्रीय संघटन मंत्री, श्री. राजन वासू नायर, महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री, सौ. बीना जयेश गोगरी, प्रदेश महिला मंच प्रमुख, श्री. कैलास वर्मा, मुंबई महानगर संघटन मंत्री, श्री. प्रदीप भट, मुंबई महानगर विधी प्रकोष्ठ प्रमुख आणि श्री. जयेश गोगरी उपस्थित होते.







