पालघर जिल्ह्यात अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर सहाजण जखमी

पालघर (विशेष प्रतिनिधी) – जिल्ह्यात सायंकाळी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अंगावर वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सायंकाळी चार वाजता जिल्ह्यातील अनेक भागात विजांचा कडकडाट आणि पाऊस सुरू झाला. याच काळात डहाणू आणि वाडा तालुक्यात घडलेल्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
यामध्ये डहाणू तालुक्यातील तवा येथील साईबाबा मंदिरा जवळ सहा जण उभे होते. यातील नितेश हाळ्या तुंबडा (वय 22) याच्यावर वीज पडून मृत्यू झाला तर अनिल धिंडा हा गंभीर जखमी झाला. जखमींवर धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर दुसरीकडे वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील एका वस्तीत 6 जणांवर वीज पडली. या मध्ये सागर शांताराम दिवा (वय 17) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर संदिप अंकुश दिवा (वय 25), अनंता चंद्रकांत वाघ (वय 24), रविंद्र माधव पवार (वय18), नितेश मनोहर दिवा (वय 19), सनी बाळु पवार (वय 18) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खानिवली येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
गेले काही दिवस पाऊस बंद होऊन भयंकर उकाडा निर्माण झाला होता. मात्र, आज विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने जिल्ह्यात दोघांचा बळी घेतला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. तर आज आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here