कंगनाच्या कार्यालयावर सुडबुद्धीने कारवाई – आशिष शेलार यांची टीका

मुंबई (हितेश मिस्त्री) – मुंबई आणि महाराष्ट्राबाबत कोणी पाकिस्तान आणि अन्य काही उल्लेख करीत असेल, तर त्याच्याशी आम्ही बिलकुल सहमत नाही. मात्र कंगना राणावतचे बांधकाम अनधिकृत होते, तर एक महिन्यांपुर्वी, एक वर्षांपुर्वी महापालिकेने कारवाई का केली नाही? त्यामुळे पालिका आणि राज्य सरकारने आजची केलेली कारवाई ही सुड बुध्दीने केलेली कारवाई आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिली आहे.
आमच्या बरोबर याल तर वाचवू आणि आमच्या विरोधात गेलात तर घरात घुसून ठोकून काढू, असे ठोकशाहीचे वर्तन राज्यातील ठाकरे सरकारचे आहे. हे आज दिसून आले, असेही आमदार ॲड आशिष शेलार यांनी सांगितले. तसेच सामनातून करण्यात आलेल्या टिकेला उत्तर देताना ते म्हणाले की, बात हरामखोरीची निघाली तर मग “डांबराने” लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल. 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय? बेईमानी नेमकी कोण करतेय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पहा
मुंबई साखळी बॉम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, ऑफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवली होती का ? पण रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलीष्काच्या घरात आणि कंगना रानावतच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना? भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना? गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना?
कर्तबगार मुंबई पोलिसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला “बिर्याणी” घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची “बिर्याणी” खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना? बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना? बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, अशा शब्दांत आमदार ॲड आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here