चोपडा (संदीप ओली) – मागील सहा ते सात महिन्यांपासुन सुरु असलेल्या कोरोनामुळे संपूर्ण हाहाकार माजलेला आहे. त्याचे परिणाम प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक विभागावर दिसुन येत आहे. धार्मिक, सामाजिक, राजकिय तसेच कौटुंबिक कार्यक्रमांवरही याचा प्रभाव जाणवत आहे.त्याचप्रमाणे याचा प्रभाव राज्यातील मुदत संपुष्टात येत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांवर सुद्धा झालेला आहे.निवडणूका न होता प्रशासकांची नियुक्ती करण्यात येणार हे याअगोदरच स्पष्ट करण्यात आले होते. यामधे प्रशासक म्हणून राजकिय पक्ष कार्यकर्ते कि शासकिय कर्मचारी हा संभ्रम कायम होता.प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील राजकिय पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांकडे फिल्डिंग लावुन बसले होते परंतु त्यांचा भ्रमनिरास होऊन आता प्रत्येक ग्रामपंचायतींवर शासकिय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासक नियुक्त करण्यात आलेल्या गावांची नावे अकुलखेडे,अजंतिसिम,अनवर्दे, भार्डु, भवाळे, बिडगाव, बुधगाव, चहार्डी, चांदसणी, चौगाव, चुंचाळे, दगडी बु., काजीपुरा, कमळगाव, खाचणे, खर्डी, खेडीभोकरी, कुरुवेल, कुसुंबे, लोणी, माचले, मजरे हिंगोणे, मजरेहोळ, मामलदे, मंगरुळ, मोहिदे, मौजे हिंगोणे, मितावली, नागलवाडी, निमगव्हाण, पंचक, पूनगाव, रुखणखेडे, तांदलवाडी, वढोदा, वर्डी, वरगव्हाण, वेले आखातवाडे, वेळोदे, विरवाडे व विटनेर ही आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ नुसार जे अधिकार व कर्तव्य सरपंचास असतात तेच अधिकार प्रशासकांना असणार आहेत.तसेच पुढील काळात सदर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होऊन विधिग्राह्यरित्या झालेली ग्रामपंचायत अस्तित्वात येईल तोपर्यंत प्रशासक म्हणून संबंधित शासकिय कर्मचार्यांना आपली जबाबदारी पार पाडावी लागेल.
एकंदरीत कोरोनामुळे का असेना परंतु गावकऱ्यांना राजकारणाविरहीत स्वच्छ कारभार बघायला मिळेल हिच सर्वसामान्य गावकऱ्यांची इच्छा असेल. प्रशासकांनी सुद्धा ग्रामपंचायतीचा कारभार स्वच्छ व प्रामाणिकपणे चालवावा हीच अपेक्षा.








