प्रसिद्ध गीतकार अभिलाष काळाच्या पडद्याआड

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – ‘इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना…’ या लोकप्रिय प्रार्थनेने प्रसिद्ध झालेले गीतकार अभिलाष यांचं निधन झालं आहे. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते पोटाच्या आजारामुळे त्रस्त होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी चार वाजता त्यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.
अभिलाष यांच्या पत्नी नीरा यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात त्यांच्या पोटातील आतड्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेमुळे त्यांना प्रचंड त्रास होत होता. या त्रासामुळे दिवसेंदिवस त्यांच्या शरीरात कमजोरी येती गेली. परिणामी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
अभिलाष हे बॉलिवूडमधील एक नामांकित गीतकार होते. १९८३ साली ‘अंकुश’ या चित्रपटासाठी त्यांनी ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ ही प्रार्थना लिहिली होती. या प्रार्थनेमुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले. जवळपास आठ भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलेली ही प्रार्थना आजही तितकिच लोकप्रिय आहे. ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ या प्रार्थने शिवाय त्यांनी ‘सांझ भई घर आजा’, ‘आज की रात न जा’, ‘वो जो खत मुहब्बत में’, ‘तुम्हारी याद के सागर में’ ‘संसार है इक नदिया’, ‘तेरे बिन सूना मेरे मन का मंदिर’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्याची निर्मिती केली. तसेच ७०-८०च्या दशकातील अनेक चित्रपटांचे संवाद देखील त्यांनी लिहिले. अभिलाष यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here