वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे आज (दि.३०) सकाळी १०:०० वाजता कोरोनामुळे नागपुर येथे दुःखद निधन झाले. ते आंबेडकरी विचाराचे भाष्यकार म्हणून सुपरिचित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारा स्थापित समता सैनिक दलाचे ते मुख्य संघटक होते. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये द्वितीय महायुद्ध, डॉ.आंबेडकर ही पुस्तके खूप गाजली आहेत. तसेच त्यांचे वर्तमानातील अंतद्वंद्व :डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कार्ल मार्क्स हे पुस्तक वैचारिकदृष्ट्या प्रगल्भतेची साक्ष देणारं होतं.
नामांतर आंदोलन, रिडल्स आंदोलन, घाटकोपर हत्याकांड आंदोलन यामध्ये त्यांचा कृतीशील सहभाग होता. त्यांचे दि पीपल हे मासिक गेल्या 30 वर्षापासून अविरत सुरु आहे. त्यांच्यापश्चात 2 मुले व पत्नी असा परिवार असून, त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीची न भरून निघणारी हानी झाली आहे.







