सध्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काम केवळ नोटिसा बजावणे ?

manoj-khandaye

प्रदूषण करणार्‍या बड्या कारखानदारांवर कारवाई कधी करणार ? – श्री. मनोज खाडये

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने, तसेच दूधप्रक्रिया, मद्यनिर्मिती, शीतकेंद्रे आदी अनेक प्रक्रिया उद्योगांंकडून प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. कोणतीही प्रक्रिया न करता मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी नैसर्गिक स्रोतात सोडले जात आहे. तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने शहरात तयार होणारा जैवकचरा आणि घनकचरा यांविषयी असलेले सर्व नियम अन् कायदे धाब्यावर बसवले आहेत. त्यातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण निर्माण झालेले आहे. असे अनेक वर्षे प्रदूषण होत असतांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी या सर्वांना नोटिसा देण्यापलीकडे कोणतीही कारवाई कलेली नाही. सध्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काम केवळ नोटिसा बजावणे एवढेच राहिले आहे का ? प्रदूषण करणार्‍या बड्या कारखानदारांवर कारवाई कधी करणार ? असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. या विषयी लवकरच महाराष्ट्राच्या पर्यावरणमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येणार्‍या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेतील भ्रष्टाचार, आरोग्य व्यवस्थेतील दुरवस्था आदी विविध सामाजिक अपप्रकारांच्या विरोधात लढा दिला जात आहे. माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती उघड झाली, त्यात कोळसे नॅचरल स्वीटनर इंडस्ट्रीज मिरज, प्रतिभा मिल्क इंडस्ट्रीज लि. जत, मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना मिरज, एम्.के. इंडस्ट्रीज आंधळी पलुस, लिकीस कंफेक्शनर्स प्रा. लिमिटेड, सूर्यप्रकाश मिल्क चिलींग प्लांट एरंडोली, माळी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स कवठेमहांकाळ, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, यशवंत सहकारी ग्लुकोज कारखाना यांसह अन्य उद्योगांकडून प्रक्रिया न केलेले प्रदुषित जल तसेच बाहेर सोडून देणे, नियमाप्रमाणे सांडपाण्याची कोणतीच व्यवस्था नसणे, प्रदुषित पाणी शेजारच्या नाल्यात सोडून देणे आदी अनेक नियमबाह्य कृती झालेल्या आहेत.

सावळी येथील श्रीनिधी कोल्ड स्टोरेज यांनी कोल्ड स्टोरेजसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची अनुमती घेतलेली नाही. तसेच इफ्लुयेंट ट्रिटमेंट प्लांट बसवलेला नाही. बालाजी स्टोन क्रशर यांनी नियमानुसार झाडे लावलेली नाहीत. श्री व्यंकटेश्‍वरा बायोरिफायनरीज अँड बायो फ्लुएल्स यांनी प्रकल्पासाठी इंधन म्हणून बगॅसची मंजुरी असतांना कोळसा वापरून नियमांचे उल्लंघन केले, तसेच विस्तारित प्रकल्प विनापरवाना चालू केला. विश्‍वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचा मद्यनिर्मिती प्रकल्प हा ‘प्रदूषण प्रतिबंधक क्षेत्रा’त चालू आहे. त्यामुळे या प्रकल्पाने बायो-डायजेस्टर बसवलेला नाही, तसेच रासायनिक प्रक्रिया झालेले प्रदुषित पाणी टाक्यात साठा करून बाहेर सोडलेले आहे.

अशी अनेक उदाहरणे आहेत. या सगळ्यातून पर्यावरणाची प्रचंड हानी १२ महिने चालू आहे. त्याबाबत कडक कारवाईचे धोरण नाही; मात्र हिंदूंचे सण आल्यावर यांना प्रदूषण आठवते, हे अत्यंत खेदजनक आहे. वास्तविक अशा नियमबाह्य कृतींसाठी मंडळाच्या अधिकार्‍यांनी तात्काळ त्या आस्थापनाचे पाणी आणि वीज यांची जोडणी तोडण्यासाठी संबंधित खात्याला पत्र दिले पाहिजे, तसेच राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार पोलिसांची मदत घेऊन कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे; परंतु मंडळाच्या अधिकार्‍यांनी मात्र वर्ष २००८ ते २०१५ पर्यंत केवळ नोटिसा दिल्या आहेत. या प्रकरणी वर्ष २०१५ मध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेवर फौजदारी खटला दाखल केला असून तो अद्यापही प्रलंबित आहे. गेल्या ५ वर्षांत या खटल्यात काहीही झालेले नाही. यावरून प्रदूषण मंडळाचा फोलपणा उघड होतो, असेही श्री. खाडये यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here